Banner

‘मूल्यवर्धन’मधून उमललेले नियम: शाळेपासून ते घरापर्यंत

सिलवासा तालुक्याच्या ‘प्राथमिक शाळा कमळीफळीया’ येथील विद्यार्थी एका मूल्यवर्धन उपक्रमादरम्यान
लहान मुलांना संधी दिली, त्यांना प्रोत्साहन दिलं, तर त्यांच्या मनातल्या कल्पनांना नक्कीच पंख फुटतात. ते निर्भयपणे आपल्या कल्पना सर्वांसमोर मांडतात. असाच काहीसा अनुभव दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील एका शाळेत आला. त्या शाळेचे नाव आहे प्राथमिक शाळा कमळीफळीया.’शाळेची स्थापना १९९४ साली झाली आहे. पहिली ते पाचवीपर्यंत असलेली ही शाळा गुजराती माध्यमाची आहे. शिक्षण विभागाची ही शासकीय शाळा सिलवासा तालुक्याच्या शहरी भागात आहे. या शाळेत एकूण ८५ विद्यार्थी स्थानिक भागातून शिक्षण घेण्यासाठी येतात, तर येथे एकूण ५ शिक्षक कार्यरत आहेत.

या शाळेत दिनांक १५ जून २०२५ पासून मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू झाला. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न येथील शिक्षक करीत आहेत.सुरुवातीला पाचवीच्या वर्गशिक्षिका सौ. हेमलता सोलंकी यांनी मूल्यवर्धनचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी १७ विद्यार्थी असलेल्या आपल्या पाचवीच्या वर्गात मूल्यवर्धनचे उपक्रम नियमितपणे राबवायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी वर्ग नियम तयार करणेहा उपक्रम घेतला. सर्वांना सांगितले, सर्वांनी होमवर्क म्हणून आपल्या वर्गाचे नियम तयार करून आणावेत.” दुसऱ्या दिवशी बहुतेक विद्यार्थ्यांनी वर्ग नियम लिहून आणले. काहींनी पाच, काहींनी सहा, तर काहींनी तीन-चार नियम तयार केले. मग सर्व विद्यार्थ्यांनी चर्चा केली आणि या सर्व नियमांमधून मुलांनी स्वतःच पाचवीच्या वर्गाचे नियम बनवले आणि ते वर्गात लावले.

१) आम्ही शिस्तीत राहू.
२) आम्ही शाळेत वाचन करू.
३) आम्ही शाळेत स्वच्छता ठेवू.
४) आम्ही शिक्षकांचे प्रत्येक सांगणे पाळू.
५) आम्ही शाळेतील प्रत्येक कार्यक्रमात भाग घेऊ.
६) आम्ही आमच्या वर्गातील आमच्या मित्रांना प्रत्येक कामात मदत करू.लोकशाही पद्धतीने तयार झालेले हे नियम सगळ्यांनी आनंदाने पाळायला सुरुवात केली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण झाली आणि इतर उपक्रमांबाबत उत्साह वाढला.

काही दिवसांनी एका मुलाने शिक्षिकेला विचारले, मॅडम, आपण जसे वर्गाचे नियम बनवले, तसेच घरासाठीही नियम बनवू शकतो का?” त्या वेळी शिक्षिका सौ. हेमलता यांनी त्याला होकार देऊन प्रोत्साहन व मार्गदर्शन केले. त्या मुलाचे नाव होते समीर सुरेश वड. समीरची कल्पना सर्वांना पटली आणि सर्वांनी आपल्या घरातील नियम बनवायचा निर्णय घेतला.

त्यादिवशी घरी गेल्यावर १३ मुलांनी आपल्या पालकांच्या मदतीने घरासाठी सोपे नियम तयार केले. जागा मिळेल तिथे त्यांनी नियमांचा सजवलेला कागद चिकटवला. काहींनी भिंतीला, काहींनी दाराला, तर अखिल नावाच्या एका विद्यार्थ्याने चक्क ‘घरचे नियम’ तयार करून फ्रीजवर नियम लावले.

१) मी रोज सकाळी लवकर उठेन.
२) मी शाळेतले धडे पाठ करेन.
३) मी माझ्या आईला घरकामात मदत करेन.
४) मी नेहमी सत्य बोलेन.
५) मी माझ्या मोठ्यांचा सन्मान करेन.
६) मी माझ्या पालकांचे प्रत्येक बोलणे मान्य करेन.यामुळे शाळेप्रमाणेच घरातही मुलांच्या वागणुकीत सकारात्मक बदल दिसून आला. मुलांनी स्वतः तयार केलेले नियम पाळल्याने ते अधिक जबाबदारीने वागू लागले आहेत. शाळेतील उपक्रम घरापर्यंत पोहोचले आहेत. मुलं घरी येऊन शाळेत दिवसात काय शिकवलं, कोणते उपक्रम घेतले यावर चर्चा करतात. त्यामुळे घरातील वातावरणातही सकारात्मक बदल होत असल्याचे पालक आवर्जून सांगतात.

आमच्या मुलाने घरातील नियम तयार केल्यामुळे तो स्वतः पाळतो आणि आम्हालाही पाळायला सांगतो. काही चुकलं तर तो म्हणतो, ‘पापा, हे असं आहे, स्वच्छता पाळायची, निरोगी राहायचं, मम्मीला मदत करायची, इतरांना मदत करायची…’ यामुळे आम्हाला अतिशय आनंद होतो. आमच्या मुलाचा आम्हाला अभिमान वाटतो,” असे अखिलचे पालक महेश भेडिया सांगत होते.

मूल्यवर्धन कार्यक्रमातून मुलांनी स्वतः नियम तयार केले आहेत, तर ते नियम पाळतात. यामुळे त्यांच्यात शिस्तपणा आला आहे. वर्गालाही शिस्त लागली आहे. हा बदल पाहून आम्हाला खूप आनंद होतो,” असे शिक्षिका हेमलता अभिमानाने सांगतात.ही आहे देशाच्या एका कोपऱ्यात समुद्रातील बेटावर वसलेल्या दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील प्राथमिक शाळा कमळीफळीया’ येथील मुलांच्या कल्पनाशक्तीची गोष्ट. अर्थात, मूल्यवर्धन कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये आणि कुटुंबामध्ये सकारात्मक बदल घडत असल्याची ही शालेय परिवर्तनाची गाथा आहे.