Banner

राज्यात ‘मूल्यवर्धन ३.०’ च्या नव्या अध्यायास प्रारंभ!

उद्घाटन प्रसंगी डॉ. इब्राहिम नदाफ, सौ. वर्षाराणी भोपळे, श्री. शांतिलाल मुथ्था, श्री. विलास राठोड, श्री. व्ही. वेंकटरमना व इतर मान्यवर
(दिनांक : २८ जुलै २०२५)

पुणे :
शासनाच्या शिक्षण विभागातर्फे या वर्षीपासून राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत ‘मूल्यवर्धन ३.०’ हा कार्यक्रम राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासन आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन (एसएमएफ) यांच्यात मूल्यवर्धन ३.० अंमलबजावणी संदर्भात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला आहे.

या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एमएससीईआरटी) आयोजित केलेल्या राज्यस्तरीय प्रशिक्षकांच्या पाच दिवसीय प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्यास भारतीय जैन संघटनेच्या वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प येथे प्रारंभ झाला. याचे उद्घाटन एमएससीईआरटीच्या समता विभागाचे उपसंचालक डॉ. इब्राहिम नदाफ, समता विभागाच्या प्रमुख वर्षाराणी भोपळे, शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक शांतिलाल मुथ्था, बीजेएस शाळा प्रबंधन समितीचे अध्यक्ष विलास राठोड, एसएमएफचे कार्यकारी संचालक व्ही. वेंकटरमना यांच्या प्रमुख उपस्थित झाले. या प्रसंगी पहिल्या टप्प्यात बुलढाणा, नागपूर, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, अकोला या आठ जिल्ह्यातून आलेले शिक्षक, एमएससीईआरटी अधिकारी तथा एसएमएफचे मूल्यवर्धन तज्ज्ञ, मास्टर ट्रेनर्स आदी उपस्थित होते. राज्यातील निवडक शिक्षकांचे प्रशिक्षण दि. १६ जून ते १८ जुलै दरम्यान एकूण पाच टप्प्यात होणार आहे.